गौतम गंभीर पंचांशी मैदानात का भिडला; व्हिडिओमध्ये पाहा असं नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली : केकेआर व आरसीबी हे दोन संघ जेव्हा एकमेकांच्या समोर येतात तेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने ते भिडताना दिसतात. रविवारच्या मॅचमध्येही असेच काही घडले. आधी विराट अंपायरशी वाद घालताना दिसला नंतर गौतम गंभीर व केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित अंपायरशी वाद घालताना दिसले.

केकेआर व आरसीबी या दोघांत कोलकाताच्या मैदानावर म्हणजे ईडन गार्डनवर रोमांचक असा सामना झाला. सामन्यादरम्यान काही वादविवाद ही झाले. आधी विराट कोहली थर्ड अंपायरने दिलेल्या चुकीच्या निर्णयावर नाराज होत मैदानात अंपायरशी भिडताना दिसला होता. तसेच आरसीबी फलंदाजी करत असताना काही षटके शिल्लक असतानाच गौतम गंभीर चौथ्या अंपायरशी वाद घालत असल्याचे चित्र मैदानावर पहायला मिळाले. त्यामुळे सध्या गंभीरचा वाद घालतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

केकेआरने टॉस जिंकून आधी फलंदाजीचा निर्णय घेतला व आरसीबीसमोर २२३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आरसीबीचे फलंदाज धावांचा पाठलाग करत लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचले होते. पण एकामागोमाग पटकन विकेट गमावल्यामुळे २२१ धावांत आरसीबी गार झाली व फक्त १ धावाच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. केकेआर गोलंदाजी करत असताना सामन्याच्या १९ व्या षटकात गंभीर व केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित चौथ्या अंपायरशी वाद घालत होते. केकेआरला शेवटच्या दोन षटकात सुनील नरायण च्या जागी रहमानुल्लाह गुरबाजला क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरवायचे होते पण चौथ्या अंपायरने त्यासाठी परवानगी नाकारली याच कारणामुळे वाद झाला असल्याचे म्हटले जात आहे.

सुनील नरायणने आपली चार षटके पूर्ण केली होती त्यामुळे केकेआरला अंतिम दोन षटकात क्षेत्ररक्षणासाठी एक उत्सर्फुत असा खेळाडू मैदानात पाहिजे होता. पण वाद घालून काहीही उपयोग झाला नाही शेवटी चौथ्या अंपायरचा निर्णयच अंतिम ठरला व नरायणलाच अंतिम षटकात क्षेत्ररक्षण करावे लागले. या सामन्यात केकेआरने आधी फलंदाजी करत २० षटकांत ६ विकेट्स गमावत २२२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करत आरसीबीच्या विराट कोहलीने चांगली सुरुवात केली. पण हर्षित राणाने तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडू फुलटॉस टाकत विराटला जाळ्यात आडकवले. विराट चेंडू मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडूची दिशा न समजल्याने तो झेलबाद झाला. हर्षित राणाने नो बॉल टाकल्याचे आधी दिसत होते पण थर्ड अंपायरने पुन्हा कॅमेऱ्यात बघितले तर दिसले की विराट आधीच पुढे आला होता त्यामुळे चेंडू जेव्हा त्याच्यापर्यंत आला तो त्याच्या कमरेच्या खालीच होता म्हणून विराटला आऊट देण्यात आले.

थर्ड अंपायरच्या या निर्णयानंतर विराट खूपच भडकला होता. तो मैदानातील अंपायरसोबत भांडत होता व थर्ड अंपायरच्या निर्णयावर त्याने टीकाही केली. मैदानातून बाहेर गेल्यावर विराटने आपली बॅटही जमिनीवर आपटली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-22T15:03:21Z dg43tfdfdgfd