..तर मी रोहित, विराटला टीम इंडियामधून बाहेर काढणार; गंभीरने BCCI ला स्पष्टच सांगितलं

Virat Kohli Rohit Sharma Will Be Drop: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून लवकरच रुजू होईल अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी गौतम गंभीरची या अत्यंत महत्त्वाच्या पदासाठी मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गंभीरने काही अटी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासहीत अन्य अधिकाऱ्यांसमोर ठेवल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अटींमध्ये गंभीरने भारताचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा आणि सध्याच्या घडीला जागतिक स्तरावरील आघाडीचा फलंदाज विराट कोहलीला अल्टीमेटम दिलं आहे. या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंना 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आली नाही तर आपल्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापन या दोघांशिवाय पुढील वाटचाल करेल असं गंभीरने बीसीसीआयला कळवलं आहे.

गंभीरने ठेवल्या या दोन महत्त्वाच्या अटी

गौतम गंभीरने बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत काही अटी घातल्याचं वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिलं आहे. सध्या सुरु असलेली टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा संपल्यानंतर विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे राहुलनंतर गंभीर या पदाचा पदभार स्वीकारणार आहे. मात्र ही जबाबदारी स्वीकारण्याआधी गंभीरनेच काही अटी बीसीसीआय समोर ठेवल्यात. गंभीरने आपल्याला संघावर पूर्ण नियंत्रण हवं असं स्पष्टपणे सांगितलं आहे. आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये कोणीही हस्ताक्षेप करणार नाही, असंही गंभीरने आपल्या अटींमध्ये नमूद केलं आहे. दुसऱ्या अटीमध्ये गंभीरने त्याला त्याच्या मनाप्रमाणे कोचिंग स्टाफ निवडण्याची मूभा हवी आहे. यामध्येही कोणी हस्ताक्षेप केलेलं त्याला आवडणार नाही, असं स्पष्ट करम्यात आलं आहे. 

नक्की वाचा >> ...तर T20 World Cup मधून टीम इंडिया बाहेर पडणार! समजून घ्या नेमकं समीकरण

...तर विराट-रोहितला दाखवणार बाहेरचा रस्ता

गंभीरची तिसरी अट ही विराट कोहली आणि रोहित शर्मासंदर्भात आहे. गंभीरने आपण प्रशिक्षक झाल्यास रोहित शर्मा आणि विराट कोहलीला त्यांच्या कारकिर्दीमधील शेवटची आयसीसी स्पर्धा खेळण्याची संधी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून दिली जाईल असं सांगितलं आहे. पाकिस्तानमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये रोहित आणि विराटला संघाला जेतेपद मिळून देण्यात अपयश आलं तर या दोघांनाही संघातून बाहेर काढण्यासंदर्भात पुढील निर्णय घेतले जातील असं सांगण्यात आलं आहे.

सध्या सलामीवीर...

सध्या विराट आणि रोहित भारतीय संघासाठी टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सलामीवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसत आहे. भारताने ही स्पर्धा जिंकली तर एका दशकाहून अधिक काळापासून सुरु असलेला आयसीसी जेतेपदाचा दुष्काळ संपेल असं म्हणता येईल. 

2024-06-24T03:14:09Z dg43tfdfdgfd