मुंबईच्या पराभवापेक्षा त्या RUN OUT चीच जोरदार चर्चा, तिसऱ्या पंचांचा निर्णय ठरला वादग्रस्त

लखनौ : मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंट्सकडून अखेरच्या षटकात पराभव झाला. पण मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा यावेळी जोरदार चर्चा सुरु आहे ती लखनौच्या आयुष बदोनीच्या रन आऊटची. कारण हा रन आऊटचा निर्णय देताना तिसऱ्या पंचांनी मोठी चूक केली आणि त्यामुळेच हा निर्णय जोरदार ट्रोल व्हायला लागला आहे.

क्रिकेटचा रन आऊटबाबतचा नियम काय सांगतो, जाणून घ्या...

जेव्हा एखाद्या फलंदाजाचा रन आऊटचा निर्णय द्यायचा असेल, त्यावेळी जेव्हा बेल्स उडाल्या तेव्हा फलंदाज किंवा त्याची बॅट नेमकी कुठे होती हे पाहिले जाते. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने यावेळी हा नियम समजवून सांगितला. इरफान म्हणाला की, " या सामन्यात जेव्हा यष्टीरक्षकाने बेल्स उडवल्या तेव्हा फलंदाजाची बॅट नेमकी कुठे होती, हे पाहिले गेले पाहिजे. पण यावेळी फलंदाजाच्या बॅटचा पुढील भाग हा हवेत होता आणि त्यानंतरचा बॅटचा खालचा भाग हा जमिनीलगत होता. त्यामुळे जमिनीलगत भाग हा कधी क्रिझमध्ये आला ते पाहून तिसऱ्या पंचांनी निर्णय द्यायला हवा. जेव्हा स्टम्पला बॉल लागतो त्यापूर्वी बॅट क्रीझमध्ये आली होती की नाही, हे पाहायला हवे."

नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या....

ही गोष्ट घडली ती १९ व्या षटकात. त्यावेळी हार्दिक पंड्या हा गोलंदाजी करत होता आणि त्याचा सामना लखनौचा आयुष बदोनी करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर बदोनीने चांगला फटका मारला आणि तो दोन धावांसाठी धावला. त्यावेळी आयुषने एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेसाठी जात असताना तो रन आऊट होऊ शकतो, असे वाटत होते. यावेळी मुंबईचा यष्टीरक्षक ईशान किशनच्या हातात चेंडू आला होता, पण त्याला पहिल्या फटक्यात चेंडू स्टपला लावता आला नाही. त्यानंतर ईशानने दुसऱ्या फटक्यात चेंडू स्टम्पला लावला. त्यावेळी तिसऱ्या पंचांकडे हा रन आऊटचा निर्णय मैदानातील पंचांनी सोपवला होता.

ज्यावेळी ईशानने बॉल स्टम्पला लावला, त्यावेळी आयुषच्या बॅटचे पहिले टोक आणि बराचसा भाग हा हवेत होता आणि बॅटच्या दांड्याखालील भाग हा जमिनीलगत होता. त्यामुळे बऱ्याच जणांना आयुष नॉट आऊट असल्याचे वाटत होते. पण तिसऱ्या पंचांनी यावेळी त्याला बाद दिले आणि हा निर्णय वादग्रस्त ठरला.

चाहते म्हणायला लागले Umpires Indians

तिसऱ्या पंचांनी हा निर्णय मुंबई इंडियन्सच्या बाजूने दिल्याचे काही चाहत्यांचे म्हणणे होते. त्यामुळे पंच हे मुंबई इंडियन्ससोबत आहेत, अशी त्यांची धारणा झाली. त्यामुळे काही चाहत्यांनी यावेळी Umpires Indians म्हणते पंचांना ट्रोल केले.

जेव्हा ईशान किशनने स्टम्पला चेंडू लावला त्यापूर्वीच आयुषचा बॅटचा खालील भाग हा क्रीझमध्ये पोहोचला होता. एकदा का बॅट क्रीझमध्ये पोहोचली तर फलंदाज बाद कसा ठरवला जाऊ शकतो, असे चाहत्यांचे म्हणणे होते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-01T02:45:49Z dg43tfdfdgfd