राणा दा जिंकलस... अखेरच्या चेंडूवर केकेआरचा आरसीबीवर थरारक विजय

कोलकाता : राणा दा जिंकलंस... असंच या सामन्यानंतर केकेआरच्या चाहत्यांनी म्हटलं असेल. कारण केकेआरचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राणाने विराट कोहली आणि सुयश प्रभूदेसाई यांना बाद केले. आरसीबीला यावेळी विजयासाठी एका चेंडूत तीन धावांची गरज होती. पण आरसीबीने अखेरच्या चेंडूवर एकच धाव घेता आली आणि केकेआरने फक्त एका धावेने हा सामना जिंकला. फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यर यांच्या खेळींच्या जोरावर केकेआरला २२२ धावांचा डोंगर उभारता आला. आरसीबीची २२३ धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली नाही. विराट कोहली आणि फॅफ ड्यु प्लेसिस लवकर बाद झाले. पण रजत पाटीदार आणि विल जॅक्स यांनी अर्धशतकं झळकावत सामन्यात रंगत आणली. दिनेश कार्तिक यावेळी अपयशी ठरला असला ती कर्ण शर्माने ७ चेंडूंत २० धावा करत सामना रंगात आणला होता. पण कर्ण मोक्याच्या क्षणी बाद झाला आणि केकेआरले एका धावेने हा सामना जिंकला.

केकेआरच्या २२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण विराट कोहली यावर १७ धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्यावर फॅफ ड्यु प्लेसिसही लवकर बाद झाला. फॅफला यावेळी ७ धावा करता आल्या. त्यामुळे आरसीबीची २ बा ३५ अशी अवस्था झाली होती. पण यावेळी विल जॅक्स आणि रजत पाटीदार यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली व संघाचा डाव सावरला. पण आंद्रे रसेलने जॅक्सला बाद केले आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. जॅक्कने यावेळी ३२ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५५ धावा केल्या. रसेलने या षटकातच पाटीदारलाही बाद केले आणि आरसीबीला दुसरा धक्का दिला. पाटीदारने यावेळी २३ चेंडूंत ३ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५२ धावा केल्या. हे दोघे बाद झाले आणि आरसीबी हा सामान गमावणारा असे वाटायला लागले. कारण सुनील नरिननेही एकाच षटकात दोन विकेट्स मिळवले आणि आरसीबीला पिछाडीवर ढकलले. पण यावेळी आरसीबीचा आशा ही दिनेश कार्तिकवर होत्या. पण कार्तिक यावेळी मोठी खेळी साकारू शकला नाही आणि आरसीबीला पराभव पत्करावा लागला.

आरसीबीने टॉस जिंकला आणि केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा फायदा केकेआरचा सलामीवीर फिल सॉल्टने चांगलाच उचलला. सॉल्टने यावेळी आरसीबीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि फक्त १४ चेंडूंत ४८ धावांची तुफानी खेळी साकारली सॉल्टने या वादळी खेळीत ७ चौकार आणि तीन षटाकारांची अतिषबाजी केली. पण सॉल्ट बाद झाला आणि केकेआरला एकामागून एक असे तीन धक्के बसले. सॉल्टनंतर सुनील नरिन हा १० धावांवर बाद झाला, तर अंगक्रिश रघुवंशी यावेळी तीन धावा करू शकला. संघाची ही पडझड थांबवली ती श्रेयस अय्यरने.

श्रेयसने यावेळी अर्धशतक झळकावत केकेआरचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. श्रेयसने ३६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारली. श्रेयसनंतर फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंग, आंद्रे रसेल आणि रमणदीप सिंग यांनी अखेरच्या षटकांत धडाकेबाज फटकेबाजी केली. त्यामुळेच केकेआरच्या संघाला यावेळी २२२ धावांचा पल्ला गाठता आला.

आरसीबीच्या संघाकडून यावेळी यश दयाल आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-21T14:30:06Z dg43tfdfdgfd