HAPPY BIRTHDAY SACHIN TENDULKAR : सचिनचे आयुष्य त्या १३ नाण्यांनी बदललं, पाहा असं काय घडलं...

मुंबई : जे चाहते क्रिकेटला धर्म मानतात, त्यांच्यासाठी सचिन तेंडुलकर हा देव आहे. आतापर्यंत अनेक स्वर्गीय आनंदाचे क्षण सचिनने चाहत्यांना दिले आहेत. त्यामुळे चाहते आपल्या लाडक्या सचिनचा वाढदिवस कसा विसरू शकतात. पण सचिनच्या या वाढदिवशी त्या १३ नाण्यांची अद्भूत गोष्ट समोर आली आहे. या १३ नाण्यांनी सचिन तेंडुलकरचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले.

स्वप्न पाहा, ती पूर्ण होतात... असे सचिन नेहमी म्हणत आला आहे. सचिनने अशीच लोभसवाणी स्वप्न चाहत्यांना दाखवली. काही वेळा ती पूर्ण होतील का, अशी शंका काहींना वाटली खरी. पण क्रिकेटच्या या तपस्वीने आपल्या चाहत्यांना कधीच निराश केले नाही. मग ते १०० शतकांचं स्वप्न असो किंवा विश्वविजयाचे. सचिनने आपल्या चाहत्यांना नेहमीच अनंत आनंदाचे क्षण देत त्यांचे आयुष्य समृद्ध बनवले. पण सचिन या मोठ्या उंचीवर पोहोचला, पण त्याचा पहिला सामना कोणीही विसरू शकणार नाही. सचिनने १९८९ साली पाकिस्तानमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच कसोटी मालिकेत सचिन मैदानात उतरला आणि त्याच्या नाकावर चेंडू आदळला होता. त्यावेळी सचिनच्या नाकातून रक्त वाहायला सुरुवात झाली होती. पण तरीही सचिनने हार मानली नाही आणि तो न घाबरता खेळला. पण हे क्रिकेटचे संस्कार त्याच्यावर लहानपणी केले होते ते प्रशिक्षक रमांकात आचरेकर सर यांनी. आचरेकर सरांच्याच या १३ नाण्यांनी त्याचे आयुष्य बदलून टाकले.

सचिन दादरला सराव करायचा. गुरु रमाकांत आचरेकर यांनी सचिनला चांगला सराव मिळावा यासाठी एक वेगळीच पद्धत वापरली होती. सचिन हा किती काळ फलंदाजी करू शकतो आणि गोलंदाजांचा प्रतिकार कसा करू शकतो, हे आचरेकर सर यांना पाहायचे होते. सचिनने जास्त काळ फलंदाजीचा सराव करावा, हेच त्यामागचे खरे कारण होते. त्यामुळे सचिन जेव्हा फलंदाजीचा सराव करण्यासाठी उभा राहायचा तेव्हा आचरेकर सर हे स्टम्पच्या इथे एक नाणे ठेवायचे. जो सचिनला बाद करेल, त्याला हे नाणे मिळेल असे आचरेकर सर गोलंदाजांना सांगायचे. त्यावेळी सचिनला गोलंदाजांना आपली विकेट फुकट न देण्याची सवय लागली. त्यावेळी सचिनने आचरेकर सरांची अशी १३ नाणी जिंकली होती, जी १३ नाणी सचिनने अजूनही सांभाळून ठेवली आहेत. कारण या १३ नाण्यांमुळेच सचिनचे पूर्ण आयुष्य बदलून गेले.

प्रत्येक व्यक्तीच्या यशासाठी त्याचा पाया मजबूत असावा लागतो. सचिनवर यावेळी आचरेकर सरांचे प्रशिक्षण तर मिळालेच, पण त्याचबरोबर क्रिकेटचे चांगले संस्कारही आचरेकर सरांनी सचिनवर केले. त्यामुळेच सचिन क्रिकेटच्या मैदानात कधी असभ्यपणे वागला नाही. सचिन हा नेहमीच सभ्य गृहास्थासारखाच क्रिकेट खेळला आणि त्यामुळेच तो महान ठरला. कारण सचिनवर झालेले संस्कार हे यासाठी सर्वात महत्वाचे ठरले. त्यामुळे सचिनच्या यशात सर्वात जास्त वाटा हा प्रशिक्षक आचरेकर सरांचा असल्याचे म्हटले जाते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T18:52:23Z dg43tfdfdgfd