भारत-पाकिस्तान सामना ६ ऑक्टोबरला रंगणार, कुठे होणार लढत आयसीसीने केलं स्पष्ट...

गोपाळ गुरव: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा थरार आता पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा ६ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. हा सामना नेमका कुठे खेळवण्यात येणार आहे, याची माहितीही यावेळी आयसीसीने दिली आहे.

भारताचा महिलांच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत ‘अ’ गटात समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह पाकिस्तान, गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाची कसोटी लागणार आहे. भारतीय महिलांची पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धची लढत सहा ऑक्टोबरला होणार आहे. महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशात होणार आहे.

दहा संघांचा समावेश असलेल्या नवव्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने रविवारी जाहीर केले. भारताच्या गटातील सर्व लढती सिल्हेट येथे होणार आहेत. ‘प्रत्यक संघ गटात चार लढती खेळणार आहे. अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. या लढती १७ आणि १८ ऑक्टोबरला होतील. त्यानंतर २० ऑक्टोबरला ढाक्यात अंतिम लढत होईल,’ असे आयसीसीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे. या वर्ल्ड कपमधील सर्व लढती ढाका येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सिल्हेटमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत.

भारताच्या लढती : चार ऑक्टोबर वि. न्यूझीलंड, सहा ऑक्टोबर वि. पाकिस्तान, नऊ ऑक्टोबर वि. पात्रता फेरीतून आलेला संघ, १३ ऑक्टोबर वि. ऑस्ट्रेलिया.

दृष्टिक्षेप...

- महिलांची टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा १९ दिवस चालणार आहे.

- या दरम्यान एकूण २३ लढती होणार आहेत. या लढती ढाका आणि सिल्हेट येथे होतील.

- उपांत्य आणि अंतिम लढतीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

- ‘अ’ गटात भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि पात्रता फेरीतून आलेला संघ.

- ‘ब’ गटात बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पात्रता फेरीतून आलेला संघ असेल.

- पात्रता फेरीतील पहिली उपांत्य लढत आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये, तर दुसरी उपांत्य लढत यूएई आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यावेळी म्हणाली की, "बांगलादेशात होणाऱ्या या वर्ल्ड कपसाठी मी खूप उत्सुक आहे. मागील काही वर्षांत महिला क्रिकेटचा चांगला प्रचार आणि प्रसार झाला आहे. खासकरून महिलांच्या वर्ल्ड कपचा. मला खात्री आहे, की या वर्ल्ड कपमधून सर्वांचे मनोरंजन तर होईल; शिवाय उच्च दर्जाचा खेळ तुम्हाला बघायला मिळेल."

बांगलादेशची कर्णधार निगर सुल्ताना यावेळी म्हणाली की, " हा वर्ल्ड कप आमच्या देशात होत असल्याने खूप आनंद झाला आहे. या स्पर्धेमुळे केवळ बांगलादेशच्या महिला क्रिकेटपटूंनाच नाही, तर जगभरातील महिला क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळणार आहे. या स्पर्धेसाठी आम्ही तयारी सुरू केली आहे."

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-05T13:03:08Z dg43tfdfdgfd