भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी खेळली जात आहे. गयानामध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. या स्पर्धेत सतत फॉर्मशी झगडणाऱ्या विराट कोहलीने पुन्हा निराशा केली. विराट कोहली ९ चेंडूत ९ धावा केल्यानंतर तो बाद झाला. पण तो ज्या पद्धतीने बाद झाला त्यामुळे चाहत्यांची निराशा झाली. त्याचवेळी भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला टोला लगावत संताप व्यक्त केला.
विराट कोहली रीस टोपलीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यावेळी कॉमेंट्री करत असलेले रवी शास्त्री म्हणाले की, हा विराट कोहलीचा खेळ नाही, त्याने परिस्थितीनुसार त्याचा नैसर्गिक खेळ करायला हवा होता. शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटके सहज मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये आहे, मात्र खराब शॉट्स खेळून तो बाद झाला. खराब फॉर्मशी झुंजत असताना तुम्ही हेच करता, विराट कोहलीने थांबायला हवे होते, पण तो अतिशय खराब शॉट्स खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल गयाना येथे खेळला जात आहे. भारताने इंग्लंडसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सात गडी गमावून १७१ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने ४७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. मात्र, भारतीय डावाच्या १८व्या षटकात जॉर्डनची हॅटट्रिक हुकली. त्याने सलग दोन चेंडूंवर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना बाद केले होते. जॉर्डनने या टी-२० विश्वचषकात आधीच हॅट्ट्रिक घेतली आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-06-27T18:50:24Z dg43tfdfdgfd