RASHID KHAN:अफगाणिस्तानच्या विजयानंतर ब्रायन लारा यांनी केलेल्या भाकिताची चर्चा; राशिदनेही दिली प्रतिक्रिया

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ मधील सेमी फायनल फेरीतील चार संघ आता ठरले. भारतविरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सेमी फायनलची लढत रंगणार आहे. या वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानची कामगिरीने सगळ्यांनाच चकित केले. अफगाणिस्तानने आधी न्यूझीलंड संघाला मग सहा वेळा वर्ल्डकपविजेत्या ऑस्ट्रेलिया आणि आता बांगलादेशचा पराभव करत वर्ल्डकपमधील सेमी फायनल फेरीत धडक मारली. सेमी फायनलच्या दृष्टीने खेळला गेलेला शेवटचा सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध ८ धावांनी विजय मिळवला. या वर्ल्डकपआधी ब्रायन लारा यांनी एक भाकीत केले होते त्या भाकितावर आता राशिद खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विजयानंतर कर्णधार रशीद खान म्हणाला, “वर्ल्डकपची सेमी फायनल फेरी गाठणे आमच्यासाठी स्वप्नासारखे आहे, एकंदरीत इथे पोहोचण्यामागील मुख्य कारण म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने वर्ल्डकपची सुरुवात केली, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने आमच्यात आत्मविश्वास जागा झाला, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे खरंच शब्द नाहीत.”

ब्रायन लारा यांना वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी एकदा विचारण्यात आले होते की तुमच्या मते असे कोणते ४ संघ आहेत जे सेमीफायनल गाठतील. तेव्हा ब्रायन लारा म्हणाले होते की, "भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये असतील." लारा यांनी सांगितलेले इतर ३ संघ साहाजिक होते पण अफगाणिस्तानच्या नावाने सर्वच चकित झाले होते, पण ब्रायन लारा यांच्या निवडीला अफगाणिस्तानने आता खऱ्या अर्थाने खरे ठरवले.

ब्रायन लारा यांच्या भाकिताची चर्चा

ब्रायन लारा यांच्या भाकितावर प्रतिक्रिया देत राशिद म्हणाला, “ज्या व्यक्तीने आम्ही सेमी फायनल फेरी गाठू असा अंदाज वर्तवला होता ती एकमेव व्यक्ती म्हणजे ब्रायन लारा होती, आणि आज आम्ही त्याचे भाकीत खरे ठरवले, या वर्ल्डकपपूर्वीच्या वेलकम पार्टीमध्ये जेव्हा मी ब्रायन लारा यांना भेटलो तेव्हा त्यांना मी सांगितले होते की, आम्ही तुमचा विश्वास खाली पडू देणार नाही आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू आणि सेमीफायनल फेरी गाठू आणि तुमची निवड कशी योग्य होती ते सिध्द करू.”

“आम्ही १५-२० धावांनी मागे होतो, अशा स्थितीत एकूणच मन:स्थितीवर खेळ अर्धातर अवलंबून असतो, आम्हाला माहित होते की बांगलादेश संघाला सुमारे १२ षटकांत लक्ष्य गाठायचे आहे आणि त्यामुळे त्यांचे फलंदाज नक्कीच मोठे फटके खेळायला जातील, याचाच आम्ही फायदा घेतला, आमच्या हातात जितके होते तितके प्रयत्न आम्ही त्या वेळेस केले आणि प्रत्येक खेळाडूने उत्कृष्ट कामगिरी केली.” राशिदने सामना कुठे जिंकले यावर मत मांडले.

“विशेषत: क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये आमच्या संघाकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत, या गोलंदाजांनी स्पर्धेत चांगली सुरुवात करून आमचा मार्ग अधिक सोपा केला, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पाऊस सतत येत-जात राहिला पण त्यमुळे आम्ही कधीच आमचे लक्ष सामन्यातून जाऊ दिले नाही थोडेही विचलित झालो नाही, मानसिकदृष्ट्या आम्ही सामन्यातच होतो, आम्हाला दहा विकेट्स घ्यायच्या होत्या आणि सेमीफायनल फेरी गाठण्याचा हा एकमेव मार्ग दिसत होता, आम्ही तशी कामगिरी करण्यात यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद आहे.” संघाच्या कामगिरीवर राशिद म्हणाला.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-25T08:56:07Z dg43tfdfdgfd