SURYAKUMAR YADAV : सूर्या नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, विराटच्या विश्वविक्रमाची केली बरोबरी

दिगंबर शिंगोटे : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आतापर्यंत अनेक विक्रम रचले आहेत. त्याच्या एका विक्रमाशी धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याने बरोबरी केली आहे.

टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपमधील ‘सुपर एट’ सामन्यात भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय नोंदवला. ब्रिजटाउनमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीला भारताची नवव्या षटकात ३ बाद ६२ अशी स्थिती झाली होती. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज फलंदाज माघारी परतले होते. मात्र, अशा परिस्थितीत सूर्यकुमार यादवने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. त्याने धावगती वाढवली. त्याने फटकेबाजी केल्यामुळे भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. यात सूर्याच्या ५३ धावांचा मोलाचा वाटा होता. यासह सूर्याने विराट कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी केली.

सूर्याने २८ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ही खेळी केली. यासह सूर्याने हार्दिक पंड्यासह पाचव्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ६० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली होती. प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानचा डाव १३४ धावांत आटोपला. मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करणाऱ्या सूर्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पंधराव्यांदा सामनावीराचा मान मिळवला आणि विराटच्या एका मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

यापूर्वी, केवळ विराटने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक पंधरा वेळा सामनावीराचा मान मिळवला होता. आता या विक्रमाशी सूर्याने बरोबरी साधली आहे. सूर्याने मात्र ६४ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत पंधरा वेळा सामनावीराचा मान मिळवला आहे, तर विराट आतापर्यंत १२० आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत पंधरा वेळा सामनावीर ठरला आहे. विराट आणि सूर्यापाठोपाठ विरनदीपसिंह, सिकंदर रझा आणि महंमद नबी यांनी प्रत्येकी चौदा वेळा सामनावीराचा मान मिळवला आहे.

मलेशियाच्या विरनदीपने ७८ सामन्यांत, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने ८६ सामन्यांत, तर अफगाणिस्तानच्या महंमद नबीने १२६ सामन्यांत हा मान मिळवला आहे.

आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा बहुमान मिळवण्याचा विक्रम मुंबईकर सचिन तेंडुलकरांच्याच नावावर आहे. सचिनने ६२ वेळा हा मान मिळवला आहे.

सूर्याने या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत दोन अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे या पुढील सामन्यांत तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. त्यामुळे आता सूर्या किती सामनावीर पुरस्कार पटकावतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-21T15:01:32Z dg43tfdfdgfd