बांगलादेशची चमकदार कामगिरी; नेपाळचा पराभव करताच सुपर-८ मध्ये घेतली दमदार एंट्री

मुंबई : टी-२० वर्ल्डकपमध्ये आता लवकरच सुपर-८ मधील संघामध्ये सामने रंगणार आहे. सुपर-८ मध्ये आतापर्यंत सात संघानी आपले स्थान पक्के केले असून एका स्थान रिकामी होते. बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामन्यात जर बांगलादेशला विजय मिळाला तर ते या स्थानावर आपला दावा करू शकतात आणि बांगलादेशने नेपाळविरुद्ध सामना जिंकून सुपर-८ मध्ये आपली दमदार एंट्री केली आहे.

बांगलादेशविरुद्ध नेपाळ सामना अर्नोस व्हेले या स्टेडियमवर रंगला. या सामन्यात नेपाळने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बांगलादेशला केवळ १०६ धावांवरच रोखले. नेपाळला लक्षय प्राप्ती करता आली नाही आणि २१ धावांनी हा सामना बांगलादेशने जिंकला. नेपाळ केवळ ८५ धावा करू शकला. बांगलादेशसाठी घातक गोलंदाजी करताना तनझिम हसन शाकिबने ४ बळी घेतले.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला नेपाळचा संघ १९.२ षटकांत ८५ धावा करून सर्वबाद झाला. नेपाळच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. कुशल मल्लाने सर्वाधिक २७ धावा केल्या तर दीपेंद्र सिंगने २५ धावा केल्या. सलामीवीर आसिफ शेख १७ धावा करून बाद झाला तर कुशल भुरटेल अवघ्या ४ धावा करून बाहेर पडला.

तनझिमची बांगलादेशसाठी दमदार कामगिरी

बांगलादेशसाठी तनझिम हसनने घातक गोलंदाजी करत ४ षटकात फक्त ७ धावा देत ४ बळी घेतले. मुस्तफिजुर रहमानने ४ षटकात ७ धावा देत ३ बळी घेतले तर शकिबल अल हसनला २ बळी तर तस्किन अहमदने १ बळी घेतला.

फलंदाज अपयशी ठरले

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश १०६ धावाच करू शकला. शाकिबने सर्वाधिक १७ धावा केल्या तर लिटन दास १० धावा करून बाद झाला. तनझिम हसन अवघ्या ३ धावा करून पव्हेलियनमध्ये परतला तर झाकीर अली १२ धावा करून बाद झाला. कर्णधार नजमुल हुसेन शांतो अवघ्या ४ धावा करून परतला. परंतु गोलंदाजांच्या पराक्रमामुळे बांगलादेशने नेपाळला हरवून सुपर-८ मध्ये प्रवेश केला. बांगलादेशने आतापर्यंत ४ सामने खेळले असून ३ सामने जिंकले आहेत. यासोबतच एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-17T04:26:11Z dg43tfdfdgfd