मुंबई इंडियन्स पराभवानंतरही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकते का, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

जयपूर : राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मुंबई इंडियन्सचा हा आठव्या सामन्यातील पाचवा पराभव ठरला. त्यामुळे या पाच पराभवानंतर मुंबईचा संघ अजूनही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकतो का, याचे समीकरण आता समोर आले आहे.

मुंबई इंडियन्स यंदाच्या हंगामात आपल्या खेळाचा जास्त प्रभाव दाखवण्यास असमर्थ ठरली आहे, त्यामुळे गुणतालिकेत सध्या सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने एकूण ८ सामने खेळले आहेत त्यापैकी फक्त तीनच सामन्यात विजय मिळवू शकली आहे. कालच्या सामन्यात मुंबईची गोलंदाजी व क्षेत्ररक्षण एकदम कमकुवत होती त्याचाच फायदा राजस्थानला झाला. मुंबई कालचा सामना पराभूत झाली असली तरी अजूनही प्लेऑफमध्ये आपली जागा करु मिळवू शकते की नाही, हे समीकरण आता स्पष्ट झाले आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याचे कर्णधार म्हणून घेतलेले निर्णय काही सामन्यात पराभवाचे कारण ठरले. त्यामुळे हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त कोणताही मुंबईचा खेळाडू प्रभाव दाखवू शकला नाही. आपण या आधीपासून मुंबईचा खेळ पाहिला तर लक्षात येईल की मुंबई आयपीएलचे अर्धे सामने झाल्यानंतर पुढच्या उर्वरित सामन्यात चांगल्या प्रकारे पुनरागमन करताना दिसली आहे. राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यामुळे मुंबईला उर्वरित ६ सामन्यांपैकी ५ सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. तसेच नेट रनरेटही सुधारावा लागणार, तेव्हाच मुंबई प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान निश्चित करु शकते.

राजस्थानची फलंदाजी पाहिली तर राजस्थानने ६ षटकांत ६१ धावा केल्या, तेही एकही विकेट्स न गमावता. पावसामुळे मध्येच सामना थांबवावा लागला. १८० धावांचा पाठलाग करत राजस्थानने चांगली सुरुवात केली होती. जॉस बटलर , यशस्वी जयस्वाल व संजू सॅमसन यांच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थान कोणत्याही अडचणीशिवाय लक्ष्य गाठू शकली. तसेच यशस्वी जयस्वालचे यंदाच्या हंगामात पहिले शतकही पहायला मिळाले. जयस्वालने नाबाद १०४ धावा केल्या.

मुंबईने टॉस जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मुंबईने आपल्या विकेट्स लवकर गमावल्याने २० षटकांत १७९ धावाच करू शकले. तिलक वर्माने ४५ चेंडूत ६५ धावा केल्या. राजस्थानचा गोलंदाज संदिप शर्मानेही महत्त्वपूर्ण पाच विकेट्स घेतल्या. मुंबई विरुद्ध विजय मिळवत राजस्थानने २ गुण प्राप्त केले. राजस्थान उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीमुळे गुणतालिकेत १४ गुण प्राप्त करत सध्या पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T12:51:30Z dg43tfdfdgfd