हार्दिक पंड्याला इरफान पठाणने सुनावले खडे बोल, बुमराहचे नाव घेत सांगितली मोठी चूक

नवी दिल्ली: मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गेले काही दिवस सोशल मिडियावर ट्रोल होत आहे. यामध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सचा दुसऱ्यांदा पराभव झाला. त्यामुळे आता हार्दिकवर नेटकऱ्यांसोबतच भारताचा माजी अष्टपैलु क्रिकेटर इरफान पठाननेही टीका केली आहे. इरफान पठानने सोशल मिडियावर हार्दिकने कर्णधार म्हणून कोणत्या चुका केल्या या बद्दल ट्वीट करत त्याचा समाचार घेतला आहे.

बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगला. ज्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सनराईजर्स हैदराबादने भेदक फलंदाजी करत २७७ धावांचा डोंगर उभा केला. मुंबई इंडियन्सने याचा पाठलाग करत २४६ धावांपर्यंत मजल मारली पण त्यांना पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे हार्दिकने कर्णधार म्हणून केलेल्या चुकांचा पाढा वाचत भारतीय माजी अष्टपैलु इरफान पठानने हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहेत. पठानने सोशल मिडियावर ट्विट करत हार्दिकला खडेबोल सुनावले.

इरफान पठानने ट्विट करुन म्हटले आहे की,' जर सर्व फलंदाज २०० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहेत तर कर्णधाराने १२० च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करणे कितपत योग्य आहे.' सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज हेनरिच क्लासिन व एडन मार्करम जेव्हा मधल्या फळीत तुफानी फलंदाजी करत होते तेव्हा बुमराहला गोलंदाजी न दिल्यानेही पठानने हार्दिकच्या या निर्णयावर बोट ठेवले. पठानने ट्विट करत म्हटले की,' जेव्हा फलंदाज आक्रमक पद्धतीने खेळत होते तेव्हा बुमराह सारख्या गोलंदाजाला ओव्हर न देणे यावरुन हे लक्षात येते की हार्दिक पंड्याने कर्णधार म्हणून खुपच साधारण प्रदर्शन केले.'

सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा रेकॉर्ड मोडत आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सनरायझर्स हैदराबादचे एकीकडे कौतुक होतेय तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यावर टिकेची झोड उठत आहे. सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत ३ बाद २७७ धावांचे लक्ष्य मुंबई इंडियन्स समोर ठेवले होते. मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी सुरुवातीपासून रनरेट चांगला ठेवत फलंदाजी केली, पण हार्दिकच्या धीम्या गतीने केलेल्या फलंदाजी वर इरफान पठानने प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हार्दिक पंड्याने फलंदाजी करत २० चेंडुत १ चौकार व एका षटकारासह २४ धावा केल्या. जयदेव उनादकटच्या चेंडूवर विकेटकिपर क्लासेनने त्याला झेलबाद करत माघारी धाडले. हार्दिकने गोलंदाजीत ४ ओव्हर मध्ये ४६ रन देत १ विकेट घेतली, पण त्याचा इकॉनॉमी रेट होता ११.५०. त्यामुळे एक खेळाडू म्हणूनही हार्दिक अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-03-28T15:04:25Z dg43tfdfdgfd