RR VS MI: मॅच झाल्यानंतर हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला मिरची झोंबली; रोहित शर्माच्या कृतीची जगभर चर्चा

जयपूर: जून महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड कधीही होऊ शकते. ही निवड होण्याच्या काही दिवसआधी भारताचा कर्णधार रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार यशस्वी जयस्वालला सूर गवसला आहे. भारताच्या या युवा फलंदाजाने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना शानदार शतकी खेळी केली. या शतकासह यशस्वीने आपण वर्ल्डकप खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले तर राजस्थान रॉयल्सला ९ विकेटनी विजय मिळवून देत आयपीएल २०२४च्या प्लेऑफमध्ये जवळ जवळ पोहोचवले.

यशस्वीच्या शतकानंतर टीम इंडियाचा कर्णधार आणि आयपीएलमधील विरोधी संघातील खेळाडू रोहित शर्माने त्याचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

आयपीएल करिअरमधील यशस्वीचे हे दुसरे शतक आहे. याआधी त्याने पहिले शतक गेल्या हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध झळकावले होते. आता दुसरे शतक देखील त्याने मुंबईविरुद्धच पूर्ण केले. तर या आयपीएल हंगामातील राजस्थानचे हे तिसरे शतक असून याआधी जोस बटलरने दोन शतक केली आहेत.

राजस्थानने विजय मिळवल्यानंतर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने यशस्वीचे अभिनंदन केले आणि त्याला मिठी मारली. भारताचे हे दोन्ही सलामीवीर खुप आनंदी दिसत होते. कदाचित हीच गोष्ट हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाला आवडली नसावी. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा ८ सामन्यातील ५वा पराभव आहे. मुंबईचा संघ ६ गुणांसह गुणतक्त्यात ७व्या क्रमांकावर आहे.

रोहित शर्माने ज्यापद्धतीने यशस्वीचे अभिनंदन आणि कौतुक केले ते पाहता टी-२० वर्ल्डकपमध्ये सलामीवीर म्हणून हे दोन खेळाडूच दिसतील. मॅच झाल्यानंतर शतकाबद्दल बोलताना यशस्वी म्हणाला, मी खुप खुप खुश आहे. मॅचच्या सुरुवातीपासून आनंद घेतला. चेंडू निट पाहून चांगले शॉट्स खेळण्याकडे लक्ष दिले. मला जे करायचे होते ते कसे करता येईल यावर फोकस केला. आणि कधी कधी तुमचे प्लॉन यशस्वी होतात. मी जास्त विचार करत नाहीय. सर्व सिनिअर खेळाडूंचे आभार व्यक्त करतो. त्यांनी मला मार्गदर्शन केले.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-23T09:51:00Z dg43tfdfdgfd