IND VS SA FINAL : भारत वर्ल्ड कप जिंकणार आणि हा खेळाडू शतकवीर ठरणार... इंग्लंडच्या खेळाडूची भविष्यवाणी

नवी दिल्ली : इंग्लंडच्या संघाला भारताने सेमी फायनलमध्ये हरवले. पण आता इंग्लंडच्या खेळाडूनेच भारत वर्ल्ड कप जिंकणार, असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्याचबरोबर भारताचा कोणता खेळाडू या वर्ल्ड कप फायलमध्ये शतक झळकावणार, हेदेखील आता या इंग्लंडच्या स्टार खेळाडूने सांगितले आहे.

वर्ल्ड कपची फायनल आता फक्त काही तासांवर आली आहे. भारतीय संघ अजूनपर्यंत अपराजित राहिलेला आहे. पण दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघही चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे हा सामना कोण जिंकेल, हे सांगता येणे सोपे नाही. पण इंग्लंडच्या स्टार खेळाडूने मात्र भारत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फेव्हरेट असल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या फायनलमध्ये शतक कोण झळकावू शकतो, हेदेखील या खेळाडूने सांगितले आहे.

आतपर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून एकाही खेळाडूने शतक झळकावलेले नाही. पण या वर्ल्ड कपमध्ये भारताचा खेळाडू शतक झळकावेल, असे या इंग्लंडच्या क्रिकेटपटूला वाटते. आतापर्यंत इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉंटी पनेसारने जी भाकितं केली आहेत, ती खरी ठरली आहेत. त्यामुळे आता मॉंटीने फायनलपूर्वा केलेल्या या वक्तव्याला जास्त वजन प्राप्त झाले आहे.

फायनलबाबत माँटी म्हणाला की, " माझ्यामते भारत हा टी २० वर्ल्ड कप जिंकेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताच्या एका खेळाडूचे शतक होईल, असेही मला वाटते आणि तो खेळाडू असेल विराट कोहली. कारण विराट हा आयपीएलमध्ये भन्नाट फॉर्मात होता. ऑरेंज कॅप त्याने पटकावली होती. पण आतापर्यंतच्या वर्ल्ड कपमध्ये विराटला एकही चांगली खेळी खेळता आलेली नाही. पण विराट हा एक दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे फायनलमध्ये तो हे सर्व अपयश धुवून काढेल आणि तो शतक झळकावेल, असे मला वाटते."

भारतीय संघ आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये अपराजित आहे. पण भारतासमोर आव्हान आहे ते दक्षिण आफ्रिकेचे. दक्षिण आफ्रिकेनेही या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारताला या सामन्यात कडवी झुंज मिळू शकते.

आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेने एकदाही वर्ल्ड कप जिंकलेला नाही. त्यामुळे हा वर्ल्ड कप जिंकला तर त्यांच्यासाठी ही ऐतिहासिक कामगिरी असेल. दुसरीकडे भारताने २००७ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर भारताला आतापर्यंत एकही टी-२० वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे हा वर्ल्ड कप भारत जिंकणार की दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असेल.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली आहे. कारण भारताने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे भारताचे मनोबल उंचावलेले असेल. पण अंतिम सामन्याचे दडपण वेगळे असते. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-28T18:24:26Z dg43tfdfdgfd