TEAM INDIA : भारताच्या स्टार ऑल राऊंडवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, या स्पर्धेत करणार पुनरागमन

मुंबई : भारताचा मुंबईकर अव्वल अष्टपैलू तसेच वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर याच्या घोट्यावर बुधवारी लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यामुळे त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. मात्र तो देशांतर्गत स्पर्धेतील लढतीसाठी उपलब्ध असेल.

काही आठवड्यांपासून शार्दूलच्या घोट्यात वेदना होत होत्या. त्याने आयपीएलपूर्वी इंजक्शन घेतले होते. मात्र परिस्थिती फार सुधारली नाही. त्यामुळे त्याने आयपीएलनंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता. देशांतर्गत मोसम सुरू होण्यास किमान तीन महिने असल्यामुळे त्याने हा विचार केला होता. त्याला या शस्त्रक्रियेमुळे तीन महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे, असे सुत्रांनी सांगितले.

शार्दूलवर शस्त्रक्रिया केलेले डॉक्टर अनुभवी आहेत. त्यांनीच इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू हॅरी केन तसेच मोहम्मद शमी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लंडनमध्ये शार्दूलवर अजून दोन आठवडे उपचार करण्यात येतील. त्यानंतर बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन प्रक्रिया होईल, असेही सुत्रांनी सांगितले. दरम्यान, शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे शार्दूलने इन्स्टाग्रामवर म्हटले आहे.

शार्दूलला भारतीय क्रिकेट बोर्डासह असलेल्या करारबद्ध खेळाडूंत स्थान आहे. त्यामुळे त्याच्यावरील उपचाराचा सर्व खर्च बीसीसीआय करणार आहे. शार्दूलच्या पायावर २०१९मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. त्याने सरत्या आयपीएल मोसमात नऊ सामन्यांत पाचच विकेट घेतल्या होत्या.

शार्दुल डिसेंबर-जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. त्यावेळेस त्याला दुखापत झाली होती. त्यानं भारतासाठी शेवटचा सामना सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला केवळ एक बळी घेता आला. दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ३२ धावांनी जिंकून भारतीय संघाचं मालिका जिंकण्याचं स्वप्न भंग केलं होतं.

अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या मुंबईच्या टीमने पुन्हा रणजी चषक उंचावला. मुंबईला ४२ वा किताब जिंकविण्यात शार्दुलची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यानं या स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये २५५ धावा केल्या आणि १२ बळी घेतले. उपांत्य फेरीत तामिळनाडूविरूद्ध शतकी खेळी करून शार्दुलनं चमकदार कामगिरी केली. यासह त्याला चार बळी घेण्यात यश आले. आयपीएल २०२४ मध्ये शार्दुल ठाकूर संघर्ष करताना दिसला. त्यानं ९ सामन्यांमध्ये केवळ ५ बळी घेतले. यादरम्यान त्याची सरासरी ९.७६ अशी राहिली. चेन्नई सुपर किंग्स कडून खेळताना आरसीबीविरूद्धच्या सामन्यात शार्दुलच्या गोलंदाजीवर खूप धावा कुटण्यात आल्या होत्या. या सामन्यात केवळ २ बळी घेतलेल्या शार्दुलनं ४ षटकांत तब्बल ६१ धावा दिल्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-06-13T07:56:56Z dg43tfdfdgfd